मित्रांनो, श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे. महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्याच आवडत्या वारी सुरु होत असून २ सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहे. या प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे. तिला आपण शिवामूठ असे म्हणतो. ती कधी, कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिवशंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे. त्यात पुहा पार्वती मातेचे पतीराज. शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दांपत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी `गौरीहार’ पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे, यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल असे म्हटले जाते.
पूर्वी स्त्रियाां घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नव्हती. अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी त्यांना मिळत होती. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये स्त्रिया आनंदाने करत असायच्या. आजही करतात. त्यामुळे नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो. आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे. परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे.
त्यामुळे त्याच्या संसाराला दत होई. देण्याचा आनंद काय असतो, हे अशा व्रतामधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही, तर वाढ होते, मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न ! ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणींना समाधान वाटत असे. तर मूठ मूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून ताम्हनात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे.
अशी जुन्या-नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वेपः सुखिनः सन्तु अर्थात सगळ्यांचे सुख, हित चिंतन करणारी आपली संस्कृती आहे. तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून आपल्याकडून काहीतरी दान केल्याचे पुण्य आपल्याला मिळेल. लोकांना ते धान्य मिळतील. म्हणून ही शिवमुठ वाहिली जाते.
आता आपण जाणून घेऊया कोणत्या सोमवारी कोणती शिवमुठ व्हायची आहे पहिला सोमवार म्हणजेच ५ ऑगस्ट त्या दिवशी तांदूळ आपल्याला वाहायचे आहे. दुसरा सोमवार १२ ऑगस्ट त्या दिवशी तीळ वाहायचे आहे. तिसरा सोमवार १९ ऑगस्ट त्यादिवशी मूग वाहायचे आहे. चौथा सोमवार २६ ऑगस्ट त्यादिवशी जवस वाहायचे आहे. शेवटचा पाचवा सोमवार २ सप्टेंबर या दिवशी सातू वाहायचे आहे.
अशाप्रकारे यावर्षी पाच सोमवार आलेले आहेत आणि त्या पाच सोमवारी शिवमुठ कोणती याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.